Thursday, March 28, 2024
HomeShlokaManache Shlok | मनाचे श्लोक

Manache Shlok | मनाचे श्लोक

Manache Shlok in Snaskrit

Manache Shlok

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

श्री रामदासस्वामिंचे मनाचे श्लोक

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥

मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥

सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥

मना मानसी दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ १२ ॥

मना सांग पां रावणां काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥ १३ ॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥

मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५ ॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥

मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥

मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥

मना सर्वथा सत्य सांडू नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥



मना वासना चूकवी येरझारा ।
मना कामना सोडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी ।
मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥

मना सज्जना हीत माझे करावे ।
रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥

न बाले मना राघवेवीण काही ।
मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥

रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥

मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥

देहेरक्षणाकारणे यत्न केला ।
परी शेवटी काळ घेऊन गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची ।
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥

महासंकटी सोडिले देव जेणे ।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥

अहल्या शिळा राघवे मुक्त केली ।
पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥

उपेक्षी कदा रामरूपी असेना ।
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥

असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥

मना प्रार्थना तूजला एक आहे ।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
जयाचेनि योगे समाधान बाणे ॥
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे ।
अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥
विविके कुडी कल्पना पालटीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥

बहू हिंडता सौख्य होणार नाही ।
शिणावे परी नातुडे हीत काही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥

बहुतांपरी हेचि आता धरावे ।
रघूनायका आपुलेसे करावे ॥
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥

मना सज्जना एक जीवी धरावे ।
जनीं आपुले हीत तुवां करावे ॥
रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसी तो निजघ्यास राहो ॥ ४३ ॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी ॥
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥

जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येउनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥

मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे ।
जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥

मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥

सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे सत्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥

सदा बोलण्यासारिखे चालताहे ।
अनेकी सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥

नसे अंतरी काम नानाविकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥

मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी ।
प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे ।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥

नसे मानसी नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥

जगी होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

नको वासना वीषयी वृत्तिरूपे ।
पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनी कामना राम नही जयाला ।
अती आदरे प्रीति नाहि तयाला ॥ ५९ ॥

मना राम कल्पतरू कालधेनू ।
निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥

उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे ।
तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥
जनीं सज्जनीं वाद हा वाढवा ।
पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥

निजध्यास तो सर्व तूटोनी गेला ।
बळे अंतरी शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदे बुडाला ।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥

घरी कामधेनू पुढे ताक मागे ।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥

नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥
धरी रे मना आदरे प्रीति रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥

नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे ।
करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥

घनश्याम हा राम लावण्यरूपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥

बळे आगळा राम कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥

सुखानंदकारी निवारी भयाते ।
जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥

सदा रामनामे वदा पूर्णकामे ।
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥

जयाचेनि नामे महादोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती ॥
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥

न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥

देहेदंडणेचे महादुःख आहे ।
महादुःख ते नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥

बहुतांपरी संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥

समस्तांमधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधूत पाहे ॥
जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥

करी काम निष्काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥

अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥

मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।
तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।
करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥

मना मत्सरे नाम सांडू नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळिताही न साहे ॥ ८१ ॥

बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो ॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।
परी अंतरी नामविश्वास तेथे ॥ ८३ ॥

विठोने शिरी वाहिला देवराणा ।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४ ॥

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५ ॥

मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेवोनि आहे ॥
तयावीण तो शीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥

मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी ।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८६ ॥

बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥ ८८ ॥

जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥

न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥

नको वीट मानू रघूनायकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ॥
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥

अती आदरे सर्वही नामघोषे ।
गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषे ।
निशेषे हरामानसी रामपीसे ॥ ९२ ॥

जगी पाहता देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्त्वता सार चिंता ॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥ ९३ ॥

तिन्ही कोप जाळू शके कोप येता ।
निवाला हरू तो मुखे नाम घेता ॥
जपे आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ॥ ९४ ॥

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ॥ ९५ ॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी ॥
पिता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥ ९६ ॥

मुखी नाम नीही तया मुक्ति कैची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहू तारिले मानवी देहधारी ॥
तया रामनामी सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥

जगी धन्य वाराणसी पुण्यराशी ।
तयेमाजि आता गती पूर्वजांसी ॥
मुखे रामनामावळी नित्यकाळी ।
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥

यथासांग रे कर्म तेही घडेना ।
घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥
दया पाहता सर्व भूती असेना ।
फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १०० ॥

जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ १०१ ॥

अती लीनता सर्वभावे स्वभावे ।
जना सज्जनालागि संतोषवावे ॥
देहे कारणी सर्व लावीत जावे ।
सगूणी अती आदरेसी भजावे ॥ १०२ ॥

हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ॥
परद्रव्य आणीक कांता परावी ।
यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥ १०३ ॥

क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ॥
मना कल्पना धीट सैराट धावे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥

विवेके क्रिया आपुली पालटावी ।
अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।
मना कल्पना सोडि संसारतापा ॥ १०५ ॥

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा ।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥
दया सर्वभूती जया मानवाला ।
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६ ॥

मना कोप आरोपणा ते नसावी ।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।
मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥ १०७ ॥

मना सर्वदा सज्जनाचेनि योगे ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा ।
जनीं वादसंवाद सूखे करावा ॥
जगी तोचि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥

तुटे वाद संवाद त्याते म्हणावे ।
विवेके अहंभाव याते जिणावे ॥
अहंतागुणे वाद नाना विकारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥

हिताकारणे बोलणे सत्य आहे ।
हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ॥
हिताकारणे बंड पाखांड वारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥

जनीं सांगता ऐकता जन्म गेला ।
परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥

जनीं हीत पंडीत सांडीत गेले ।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥ ११३ ॥

फुकाचे मुखी बोलता काय वेचे ।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥

तुटे वाद संवाद तेथे करावा ।
विवेके अहंभाव हा पालटावा ॥
जनीं बोलण्यासारखे आचरावे ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५ ॥

बहू शापिता कष्टला अंबऋषी ।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ॥
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥

धुरू लेंकरु बापुडे दैन्यवाणे ।
कृपा भाकिता दीघली भेटि जेणे ॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥

गजेदू महासंकटी वास पाहे ।
तयाकारणे श्रीहरी धावताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥

अजामेळ पापी तया अंत आला ।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी ।
धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ॥
जना रक्षणाकारणे नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनि तयाकारणे सिंह जाला ॥
न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।
तया कारणे वामनू चक्रपाणी ॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥

अहल्येसतीलागी आरण्यपंथे ।
कुडावा पुढे देव बंदी तयाते ॥
बळे सोडिता घाव घाली निशाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२३ ॥

तये द्रौपदीकारणे लागवेगे ।
त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे ॥
कळीलागि जाला असे बौद्ध मौनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४ ॥

अनाथां दिनींकारणे जन्मताहे ।
कलंकी पुढे देव होणार आहे ॥
तया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥

जनांकारणे देव लीलावतारी ।
बहुतांपरी आदरे वेषधारी ॥
तया नेणती ते जन पापरूपी ।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६ ॥

जगी धन्य तो राममूखे निवाला ।
कथा ऐकता सर्व तल्लीन जाला ॥
देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपी बुडाली ॥ १२७ ॥

मना वासना वासुदेवी वसो दे ।
मना वासना कामसंगी नसो दे ॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे ।
मना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥

गतीकारणे संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।
म्हणोनी मनातीत होवोनी राहे ॥ १२९ ॥

मना अल्प संकल्प तोही नसावा ।
सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा ।
रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३० ॥

भजावा जनीं पाहता राम एकू ।
करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विनेकू ॥ १३१ ॥

विचारूनि बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
बरे शोधल्यावीण बोलो नको हो ।
जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥

हरीभक्त वीरक्त विज्ञान राशी ।
जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ॥
तया दर्शने स्पर्शते पुण्य जोडे ।
तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥

नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।
इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥

धरी रे मना संगती सज्जनीची ।
जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्‍बुद्धि सन्मार्ग लागे ।
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥

भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत ते संत आनंत पाहे ॥
जया पाहता द्वैत काही दिसेना ।
भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥
देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७ ॥

भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले ।
जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आले ॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८ ॥

पुढे पाहता सर्वही कोंदलेसे ।
अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ॥
अभावे कदा पुण्य गाठी पडेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९ ॥

जयाचे तया चूकले प्राप्त नाही ।
गुणे गोविले जाहले दुःख देही ॥
गुणावेगळी वृत्ति तेही वळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४० ॥

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular