ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा (Gudi Padwa) हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो.
कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वषीर् शालिवाहन शक १९३८ चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते ‘शक’ असा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ ( Shalivahan Shake) यामध्ये करण्यात येतो.
गुढीपाडवा असा साजरा करावा! ( Gudi Padawa Vrat Puja Celebration)
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी (Gudi), दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.
चैत्र म्हणजे वसंत तुतील पालवीचं सुंदर मनोगत! या दिवसात असं एकही झाड नसतं ज्याला चैत्र शुद्ध प्रतिपदेचा खास मोहोर सुटत नाही. या दिवसात प्रत्येक झाड मोहोरलेलं असतं. सगळी झाडं अशी मोहोरलेली असली तरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला कडूनिंबाचं स्थान मोलाचं असतं. कडूनिंबाच्या झाडाखाली बसून ऋषिमुनींनी तप केलं. या झाडाचा पाला पाचक असतो. या झाडाच्या नवीन पानामुळे सर्व प्रकारचे त्वचारोग नाहिसे होतात. म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला पोट नीट, व्यवस्थित राहावं यासाठी कडूनिंबाची पानं खाल्ली जातात. कडूनिंबाच्या पानामध्ये गूळ, काही प्रमाणात खोबरं टाकून त्याची गोळी केली जाते आणि ती या दिवशी खाल्ली जाते.