निर्जला एकादशी ( Nirjala Ekadashi)
वर्षभरात एकूण २४ एकादशी असतात, त्यातल्या निर्जला एकादशीला धार्मिक ग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. या व्रतात पाण्याचा त्याग केला जातो म्हणून याला निर्जला एकादशी असं म्हणतात. पाणी किंवा पदार्थ प्राशन न करता हा उपास केला जात असल्याने याला निर्जला एकादशी असं म्हणतात. म्हणूनच हे व्रत अतिशय पुण्यदायी असल्याचं म्हटलं जातं.
ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं, त्याचप्रमाणे आपलं सौभाग्य अखंड राहावं म्हणून महिला हे व्रत करतात. मोक्ष आणि दीर्घायू देणारं व्रत म्हणूनही या व्रताची महती आहे. जो कोणी श्रद्धेने हे व्रत करेल त्याला मोक्ष प्राप्त होतो असंदेखील म्हणतात. ज्यांना कोणाला वर्षातल्या चोवीस एकादशी करणं शक्य होत नाही ते केवळ ही एकच एकादशी करतात. कारण सगळ्या एकादशींचं पुण्य या एकातच मिळतं.
पौराणिक महत्त्व काय आहे? ( Nirjala Ekadashi importance )
या एकादशीला पांडव एकादशी, भीमसेनी किंवा भीम एकादशी असंही म्हणतात. पांडवांचा बंधू भीम हा खाण्या-पिण्याचा खूप शौकीन असायचा हे आपल्याला माहितीच आहे. त्याला भूक सहनच व्हायची नाही. या कारणामुळे त्याला एकादशी करायला कधीच जमत नसे. भीमाव्यतिरिक्त अन्य पांडव आणि द्रोपदीदेखील वर्षभर सर्व एकादशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करत असत.
भीम आपल्या कमतरतेवर आणि हावरटपणाबाबत चिंताग्रस्त होता. हे व्रत न केल्यामुळे आपण विष्णूचा अनादर करतोय, अशी एक भावना त्याच्या मनात सदैव येत असे. या गोष्टीपासून सुटकारा मिळवण्यासाठी भीम महर्षी व्यासांकडे गेला.
तेव्हा महर्षी व्यास यांनी भीमाला निर्जला एकादशी करायला सांगितली आणि ही एक एकादशी चोवीस एकादशींच्या बरोबर आहे असंही सांगितलं. त्यानंतर भीम ही एकादशी करायला लागला. म्हणूनच ही निर्जला एकादशी भीमसेनी एकादशी (Bhimsen Ekadashi) किंवा पांडव एकादशी (Pandava Ekadashi) या नावाने प्रसिद्ध झाली.